रत्नागिरी : ‘कझाकस्तानमध्ये यंदा झालेल्या आशिया कप स्पर्धेत बायथले (Biathle) आणि ट्रायथले (Triathle) स्पर्धेत मी ५५ वर्षे गटात भाग घेतला. प्रचंड थंड पाण्यात पोहायचे, धावायचे, शूटिंग करायचे अशा प्रकारे क्षमतेचा कस लावणाऱ्या या वेगळ्या स्पर्धेत भारतासाठी मी दोन सुवर्णपदके मिळवू शकले. याचा आनंद अवर्णनीय आहे,’ अशा शब्दांत डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
समुद्रात पोहण्याच्या स्पर्धेत डॉ. पोंक्षे यांनी आतापर्यंत ३६ सुवर्णपदके पटकावली आहेत. राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीदिनी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘गौरव स्त्री-पर्वाचा’ या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुरुषोत्तम पाध्ये यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
‘कझाकस्तानच्या आशिया कप २०१९ बायथले, ट्रायथले स्पर्धेत भारतासह श्रीलंका, इटली, रशिया या देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा वेगळी होती. प्रचंड थंड पाण्यात पोहायचे, धावायचे, शूटिंग करायचे असा क्षमतेचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदके मिळवली. ५१ वर्षीय रशियन स्पर्धकांनी स्पर्धा सोडली; पण मी स्पर्धा पूर्ण केली,’ असे डॉ. पोंक्षे म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, ‘सोबतच्या रशियन स्पर्धकांनी दुसऱ्या फेरीत स्पर्धा सोडली. मीसुद्धा तिसऱ्या फेरीत दमले. स्टॅमिना संपला; पण प्रशिक्षकांनी आणि भारतीय सहकाऱ्यांनी ओरडून सांगितले, ‘कम ऑन निशि, रन फॉर नेशन.’ त्यानंतर मी उर्वरित दोन फेऱ्या जिद्दीने पूर्ण केल्या व रशियन स्पर्धकांनी येऊन मिठी मारली. ‘धिस इज इंडिया’ असे त्यांनी म्हटल्यावर अभिमान वाटला. बक्षीस घेताना भारताचा ध्वज घेतला आणि आनंद झाला. हे सारे शब्दांत मांडणे अवघड आहे.’
डॉ. पोंक्षे म्हणाल्या, ‘रन-स्विम-रन या बायथले स्पर्धेत १२०० मीटर धावणे, थंड पाण्यात २०० मीटर पोहणे आणि पुन्हा १२०० मीटर धावायचे होते. दुसऱ्या ट्रायथले स्पर्धेत शूटिंग व ५० मीटर पोहणे आणि धावणे हे चार वेळा करायचे होते. या दोन्हींतही सुवर्णपदक मिळाले.’
‘माझ्या या यशात सासूबाई, पती, आई यांचा मोलाचा वाटा आहे. माझी आई १९६०मध्ये दुचाकी, चारचाकी चालवायची. चौथी-पाचवीत तिने टिळक टँकमध्ये पोहायला पाठवले. नंतर खडकवासला बॅकवॉटरमध्ये वॉटर सर्फिंग, गोव्यात स्कूबा डायव्हिंग शिकले. पॅडी कोर्स करणारी मी रत्नागिरीतील पहिली. लग्नानंतर सासूबाईंनी पाठिंबा दिला. ‘तुला हवं ते कर,’ हा विश्वा स दिला. समुद्र, पाणी आवडत असल्याने पतीने मालगुंड येथे किनाऱ्यावर जागा दिली. त्यामुळेच मी माझे पॅशन जपू शकले. योग्य वेळी गुरू डॉ. देशमुख काका यांनी मंत्र दिला. आपण शिकतो, पैसे कमावतो; पण मरण कधी तरी येणार आहे. म्हणून वानप्रस्थाश्रमाची तयारीही करायला हवी. म्हणूनच मानसिक शांती म्हणजे ‘ट्रँक्विलिटी’ या नावाचे हॉटेल मालगुंड येथे सुरू केले. अशा विविध आघाड्यांवर काम करत आहे,’ असे डॉ. पोंक्षे यांनी नमूद केले.